Wikipedia

शोध परिणाम

सोमवार, २१ मार्च, २०२२

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आदिलशहाने मिळून शाहजी राजांचा हा मनसुबा उधळून लावला. त्यानंतर त्यांना महाराष्ट्रातून काढुन आदिलशाहीच्या नव्यानेच जिंकलेल्या प्रांतात पाठवण्यात आले. तिकडे त्यांनी थोर पराक्रम करून यश संपादन केले परंतु होदेगिरी येथे अपघाताने त्यांचा मृत्यू झाला. त्याचप्रमाणे आता आपण आपल्या परमप्रतापी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा अभ्यास करणार आहोत. मागे आपण पाहिलं आहे की शाहजी राजे निजामशाही सोडून निघाले तेव्हा त्यांच्या पाठलागासाठी त्यांचे सासरे लखुजी जाधवराव लागले, यावेळी शाहजी राजे कोकणातून घाटमाथ्यावर आले त्यावेळी जिजाबाई सात आठ महिन्याच्या गरोदर होत्या,त्यामुळे प्रवासाची दगदग होऊन धावपळीत त्यांना त्रास होऊ नये म्हणून शाहजी राजांनी त्यांना आपले निकट असलेले शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार निवासराव यांच्याकडे ठेवले आणि त्यांच्या रक्षणासाठी काही निवडक माणसे ठेवली. त्या माणसांमध्ये बाळकृष्णपंत हनुमंते, रघुनाथ बल्लाळ कोरडे, शामराज नीलकंठ अशी नावे इतिहासात आढळतात. त्याच प्रमाणे जिजाबाईंच्या माहेरून आलेल्या लोकांत गोमाजी नाईक पानसंबळ हेही नाव आढळते. याप्रमाणे जिजाबाईंना शिवनेरी किल्ल्यावर ठेवून शाहजी राजे पुढे निघून गेले, पुढे लखुजी राजांची आणि जिजाबाईंची या किल्ल्यात भेट झाल्यावर त्यांनी जिजाबाईंना सिंदखेडला येण्यास सांगितले, परंतु जिजाबाईंनी त्यांना स्पष्ट नकार देऊन तिथेच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे लखुजींनी सुद्धा त्यांच्या रक्षणासाठी काही माणसे दिली. अशाप्रकारे जिजाबाई शिवनेरी किल्ल्यात राहू लागल्या. 
पुढे शिवाजी महाराजांच्या जन्माची वेळ जवळ आली आणि फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ शुक्रवार या दिवशी अवघ्या भरतभूमी ला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वराज्याची स्थापना करणारा तेजसूर्य शिवनेरीवर जन्माला आला. आशा प्रकारे मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म अत्यंत धावपळीच्या काळात पुण्यापासून काही अंतरावर असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर इ.सन १९ फेब्रुवारी १६३० त झाला. पुत्रप्राप्तीची वार्ता विजापुरास शाहजी राजांना कळवण्यात आली. जिजाबाईंना पुत्र प्राप्त झाल्याचा आनंद सर्व आश्रित मंडळींना झाला आणि त्यांनी आनंद साजरा केला. जिजाऊंनी देवीच्या आशीर्वादाने पुत्ररत्न प्राप्त झाल्याचे मानून देवीच्या नावाने त्याचे नाव शिवाजी असे ठेवले. 

शिवरायांच्या जन्म तिथी वरून अनेक वाद सांगितले जातात. याबाबत इतिहासकारांत अनेक मतमतांतरे होती. चिटणीस बखर, शिवदिग्विजय यात वैशाख शुद्ध द्वितीय गुरुवार ही तिथी दिली आहे. तर रायरीच्या बखरीत शके १५४८ वैशाख शुद्ध पंचमी हि तिथी दिली आहे. परंतु या दोन्ही विश्वसनीय नसून अलीकडे शेडगावकर भोसले यांच्या घराण्यात सापडलेली बखर प्रसिद्ध झाली, त्यातील तिथी म्हणजेच फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ हीच विश्वसनीय आहे.याबाबत सर्व इतिहासकारांच एकमत झाले आहे. अशाप्रकारे शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळी शाहजी राजांनी मोगल,निजामशाही, आदिलशाही मुलुखात जी धामधूम उडवून दिली ती पुढे दहा वर्षे सतत चालली. यावेळी जिजाबाई आणि शिवाजीराजे हे याच जुन्नर पुणे भागात वास्तव्य करून होते, यावेळी त्यांचा मुक्काम काही काळ शिवनेरी किल्ल्यात तर काही काळ आसपासच्या मुलुखात होता. दरम्यानच्या काळात जिजाबाईंनी आपल्या विश्वासू माणसांच्या आणि कारकुनांच्या साहाय्याने शिवरायांचे संगोपन केले. त्यांना सुशिक्षण दिले. यावेळी शिवरायांनी लष्करी शिक्षण म्हणजेच घोड्यावर बसणे, तिरंदाजी करणे, बंदूक मारणे, पट्टा फिरवणे इ. युद्धोपयोगी कलांचा बराच अभ्यास केला. शाहजी राजांच्या तालमीत शिकलेल्या योद्ध्यांनी त्यांना यात तरबेज केले. यावेळी दादाजी कोंडदेव हे शाहजी राजांचे नोकर म्हणून या जागिरीचे काम सांभाळत होते. त्यांनी या जागिरीचे योग्य व्यवस्था लावली होती. पुढे जेव्हा शाहजी राजे विजापुरास स्थिर झाले, तेव्हा त्यांच्या भेटीसाठी जिजाऊ आणि शिवराय विजापुरास गेले तिथे काही दिवस राहिल्यानंतर त्यांनी पुन्हा पुण्यास येऊन राहण्याचा निर्णय घेतला आणि शिवराय व जिजाऊ पुण्यास आले. यावेळी त्यांच्यासोबत शाहजी राजांनी अत्यंत विश्वासू माणसे कारकून म्हणून पाठविली त्यात शामराज नीलकंठ पेशवे, बाळकृष्ण पंत मुजुमदार, सोनोपंत डबीर, रघुनाथ बल्लाळ कोरडे सबनीस हे होत, अशाप्रकारे आपल्या पराक्रमी पित्यासोबत काही दिवस राहून शिवराय जिजाऊसोबत पुण्यास परत आले.

२ टिप्पण्या:

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...