Wikipedia

शोध परिणाम

शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२

घाटवाटा- वरंधा घाट

फार पूर्वीपासून भारताचा विविध देशांशी जो व्यापार चालायचा, जसा भूमार्गाने चालायचा तसाच समुद्रमार्गाने सुदधा चालायचा. महाराष्ट्रात ज्या प्रसिद्ध बाजारपेठा होत्या जसे की पैठण, जुन्नर वगैरे यांच्यापर्यंत जी मालवाहतूक चाले, ती याच सह्याद्रीच्या कुशीतून ये जा करणाऱ्या घाटवाटांवरूनच केली जाई. याच मार्गाने त्याची वाहतूक चाले.

सह्याद्रीच सुंदर रूप जस नजरेत भरणारं आहे तसंच ते भीषण रौद्र सुद्धा आहे. याच दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीत अनेक घाटवाटा आहेत जसे की नाणेघाट, माळशेज घाट, वरंधा घाट,आंबेनळी घाट,फोंडा घाट,आंबोली घाट. यातील बरेच घाटमार्ग आताच्या काळात पक्के केलेले आहेत. जे आजही कोकण आणि देश यांच्यातील दुव्याचं काम करतात आणि आपल्या अस्तित्वाची साक्ष देतात.त्यातीलच एक वरंधा घाट होय.

महाडच्या पूर्वेला असलेल्या सह्याद्री रांगेत वरंधा घाटमार्ग आहे. या पर्वत रांगेत अनेक उंचच उंच डोंगर आहेत. महाबळेश्वर,रायरेश्वर असे एकापेक्षा एक डोंगर आहेत. या पर्वतांची सरासरी उंची ४००० फूट आहे. आंबेनळी घाटाच्या अलीकडे महाड एमआयडीसी च्या बाजूने एक रस्ता गेला आहे, हाच रस्ता वरंधा घाटात जातो. पुढे आपण वळण वळणाचा रस्ता पार केल्यावर माथ्यावर पोहोचतो. तेव्हा आपल्याला हिरव्यागार खोल दरीचे सुंदर दर्शन होते. इथल्या निसर्ग सौंदर्याची अनोखी दृश्य आपल्याला खंडाळा घाटाची आठवण करून देतात.

वरंधा घाट फारसा रहदारीचा नसला तरीही इथून दिसणारा निसर्ग मात्र आपल्या मनाला भुरळ घालतो,खासकरून पावसाळ्यात तर आपल्याला या उंचावरून दिसणाऱ्या निसर्गाची मोहिनीच पडते. अनेक ठिकाणांहून पडणारे फेसाळ धबधबे याच्या सौंदर्यात भर घालतात. घाटातील डोंगरांनी जणू धुक्याची चादर पांघरलेली असते. त्याचप्रमाणे सगळे डोंगर हिरवी शाल पांघरून बसलेले असतात. 

वरंधा घाटाचे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा तितकेच आहे. अनेक ऐतिहासिक शिवकालीन किल्ले आणि ठिकाणे आपल्याला इथून दिसू शकतात. वरंधा घाटाच्या डाव्या बाजूला असाच एक किल्ला या घाटवाटेच्या रक्षणासाठी कायम उभा आहे, त्याचं नाव आहे कावळ्या किल्ला. त्याची उंची अंदाजे २००० फूट आहे.

त्याचप्रमाणे घाट मार्ग चढत असतांना वरंध गावच्या अलीकडे एक रस्ता शिवथर घळीकडे जातो. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली शिवथर घळ येथून जवळच आहे. याच ठिकाणी समर्थांनी श्रीमद दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. घाटमार्ग पार केल्यावर पुढे आपल्याला राजगड, तोरणा या किल्ल्यांची शिखरे दिसतात. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला खाली कोकणातील रायगड किल्लाही दिसतो. तसेच पुढे गेल्यावर आपल्याला रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार, कंगोरी किंवा मंगळगड किल्ला यांचे दर्शन होते.

महाड ते वरंध घाट अंतर २० किमी आहे. घाट माथ्यावर चहा-भजींची दुकाने आहेत पण राहण्यासाठी आपल्याला पुढे भोरला जावे लागते. वरंध घाट ते भोर हे अंतर ४० किमी आहे. वाटेत आपल्याला रायरेश्वर, रोहिडा, केंजळगड अशी ठिकाणे लागतात. हा सर्व प्रदेश शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला आहे, त्यामुळे या भागाचं वैशिष्ट्य विशेष आहे.

वरंधा घाटातून दिसणारं निसर्ग सौंदर्य


भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...