Wikipedia

शोध परिणाम

गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२

छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या स्फुर्तीदायक अद्भुत घटनांचा अभ्यास.

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत. सतराव्या शतकात जन्मलेल्या या युगप्रवर्तक राजाच्या चरित्रातील कोणताही प्रसंग आपण वाचला किंवा त्यावर अभ्यास केला तर आपल्याला प्रत्येक वेळी या थोर पुरुषाची नव्यानेच ओळख होते. आता पर्यंत शिवचरित्रावर अनेक पुस्तके, ग्रंथ लिहिले गेले आहेत पण प्रत्येकाला आपल्या रोजच्या कामातून वेळ काढून ती वाचता येतातच असे नाही.
           माझ्याकडे असलेली शिवरायांच्या जीवनावरील जी काही अल्पस्वल्प माहिती मी आपल्यापर्यंत या ब्लॉग च्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. यासाठी मी वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या शिवचरित्राची मदत घेत आहे. हा ब्लॉग म्हणजे कोणत्याही प्रकारचे इतिहास संशोधन नाही तर इतिहासकारांनी केलेल्या संशोधनाची मदत घेऊन आपल्या पर्यंत शिवचरित्र पोहोचावा इतकाच माझा उद्देश आहे.
       

शिवचरित्र अभ्यासात असतांना आपण शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा त्यांच्या कार्याचा क्रमाक्रमाने अभ्यास करणार आहोत. इ. स. १००० च्या सुमारास परकीय आक्रमक हिंदुस्थानात येऊ लागले होते. संपूर्ण हिंदुस्थान भर आपली सत्ता स्थापित करायला त्यांना ५०० ते ६०० वर्ष लागली, परंतु या काळात त्यांना इथल्या स्थानिक राजांनी विरोध केला नाही असे नाही, पण यात त्यांना यश आले नाही. 
      शिवचरित्र वाचण्याआधी आपल्याला तत्कालीन राजकीय, सामाजिक,आणि भौगोलिक परिस्थितीचा अंदाज असणे गरजेचे आहे.
     परकीय आक्रमण भारतावर झाल्यानंतर हिंदुस्थानातील स्वदेशी राज्यकर्त्यांची सत्ता जाऊन ते या परकीयांचे मांडलिक झाले. आणि हिंदुस्थानशी किंवा इथल्या संस्कृतीशी जराही साधर्म्य नसलेल्या परधर्मीय सत्ता हिंदुस्थानावर स्थापन झाली. ही सत्ता स्थापन होण्यासाठी बराच काळ जावा लागला.
      इ. सन सहाव्या शतकाच्या शेवटी अरबस्थानात मुसलमानी धर्माची स्थापना मुहंमद पैगंबर यांनी केली. त्यानंतर आठव्या शतकात हिंदुस्थानात सत्ता स्थापनेसाठी त्यांचा प्रवेश झाला, त्यानंतर पुढे इथल्या मोठ्या भूभागावर अंमल बसवायला तीनशे वर्ष लागली. इ.सन १००० च्या सुमारास गजनवी चा महमूद हा हिंदुस्तान वर स्वाऱ्या करू लागला. त्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच मुसलमान सुलतानांच्या स्वाऱ्या झाल्या. आणि त्यानंतर सहाशे वर्षाच्या काळात सर्व देश या सुलतानांनी व्यापुन टाकला.
    पुढे इ.सन सतराव्या शतकात दक्षिण हिंदुस्थानात महाराष्ट्र म्हणून जो भाग आहे, तेथील लोकांनी स्वदेशाभिमानी वृत्ती बाळगून आणि आपल्या शौर्याच्या बळावर या परकीय सुलतानांवर मात करून इथे स्वराज्य स्थापन केले.
सतराव्या शतकातील हिंदुस्थान
     इ.सन १७ व्या शतकाच्या सुरुवातीला उत्तर हिंदुस्थानात मोगलांची सत्ता स्थापन होऊन स्थिरावली होती. मोगल बादशाहा अकबराची कारकीर्द सुरू होती, आणि त्यांनी दक्षिणेवर चढाईचे धोरण चालू ठेवले होते. सर्व हिंदुस्थानावर त्यांची एकछत्री मोगली अंमल बसवायची महत्वकांक्षा होती. दक्षिणेतील राजकीय परिस्थितीचा विचार करायचा तर आपल्याला बहामनी साम्राज्याचा विचार करावा लागतो. हे हिंदुस्थानातील दक्षिणेकडचे पहिले स्वतंत्र इस्लामी साम्राज्य होते. इ.सन १४ व्या आणि १५ व्या शतकांत अस्तित्वात असलेल्या या साम्राज्याचे मुख्य केंद्र गुलबर्गा आणि बीदर या ठिकाणी होते. अल्लाउद्दीन हसन बहामनी उर्फ हसन गंगू बहामनी हा याचा संस्थापक होता. या बहामनी साम्राज्याचे पुढे तुकडे होऊन यातून पाच शाह्या निर्माण झाल्या, त्यापैकी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, वऱ्हाडातील इमादशाही, आणि बीदरची बरीदशाही अशा या पाच शाह्या. शिवकाळापर्यंत यापैकी तीनच शिल्लक राहिला होत्या, इमादशाही आणि बरीदशाही यांचा शेवट झाला होता.

भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म

मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...