Wikipedia
सोमवार, २१ मार्च, २०२२
भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म
शुक्रवार, २५ फेब्रुवारी, २०२२
शाहजी राजांची आदिलशाहीतील नोकरी
मागे आपण पाहिलं की, शहाजहानच्या प्रचंड मोठ्या सेनासागराशी झुंज देत असलेल्या शाहजी राजांना अपयश घेऊन आपल्या ताब्यातील मुलुख,किल्ले शत्रूच्या स्वाधीन करून स्वतःला आदिलशहाची नोकरी पत्करावी लागली. त्यानुसार ते विजापुरास आले. यावेळी आदिलशहाने त्याच्या सरदारांनी, रणदुल्लाखान, मुरार जगदेव यांनी त्यांचा बहुमान केला. यावेळी मोगलांशी आदिलशहाच्या झालेल्या तहानुसार शाहजी राजांची पूर्वीची जहागीर पुणे, सुपे हे परगणे त्याने शाहजी राजांकडेच कायम केले. त्या परगण्यांची व्यवस्था पाहण्याचं काम शाहजी राजांनी दादाजी कोंडदेव नामक ब्राह्मणास दिले.आणि त्यांच्या पदरी एक हजर स्वार दिले. या स्वारांवर सिद्दी हिलाल याला प्रमुख म्हणून नेमले.
| मुरार जगदेवाने पुण्यात गाढवाचा नांगर फिरवला होता, शिवरायांनी पुणे पुन्हा बसवुन येथील लोकांची भीती घालवली, यावेळी सोन्याचा नांगर शेतात शिवरायांच्या हाताने फिरवला, यावेळी दादाजी कोंडदेव |
मोगलांकडून आदिलशहास भीमा व निरा या नद्यांमधला प्रांत मिळाला होता, आणि त्याची व्यवस्था लावण्याच्या कामी मुरारपंताने शाहजी राजांना बरोबर घेतले. मुरारपंतांना हे माहिती होते की या प्रदेशाची चांगली माहिती शाहजी राजांना आहे, त्यानुसार त्यांनी या प्रदेशाची व्यवस्था लावली, तेव्हा त्यावेळी मुरार जगदेव यांचा शाहजी महाराजांवर प्रचंड लोभ बसून त्याने आदिलशाहास त्यांची तारीफ केली आणि शिफारस केली कि, असा शूर, मुत्सद्दी, युध्दकलानिपुण पुरुषास सहसा सोडू नये. यानंतर शाहजी राजे विजापुरास जास्त राहिले नाहीत. कर्नाटकातील प्रांतात आपले प्रस्थ वाढवण्यासाठी आदिलशहाने रणदुल्लाखानाची नेमणूक केली आणि त्याच्या मदतीस शाहजी राजांना पाठवले आणि शहाजी राजांना या कर्नाटक प्रांतात जहागीर देण्याचे कबूल केले. पुढील काही दिवसानंतर राजांनी या भागातील जमेदारांस नमवून हा प्रांत आपल्या ताब्यात आणला. त्यानुसार त्यांनी जे परगणे जिंकले होते ते त्यांची जहागीर म्हणून त्यांच्याकडेच ते कायम केले. याप्रमाणे रतनपूर, देवगड, कानकगिरी, व राजदुर्ग हे परगणे शाहजी राजांना जहागिरी दाखल मिळाले.
यावेळी कर्नाटक व द्रविड भागातील या नव्यानेच प्राप्त झालेल्या मुलुखाची व्यवस्था लावणे कठीण काम असल्याचे जाणून आदिलशहाने या कामात तरबेज असलेल्या आणि मलिक अंबरच्या तालमीतले असलेल्या शाहजी राजांना या भागाची सुभेदारी दिली. शाहजी राजांनी या भागातील बेबंदाई मोडून धामधूम नाहीशी करून जिकडेतिकडे चांगला बंदोबस्त केला. पुढे शाहजी राजांनी तंजावर प्रांत सुद्धा आपल्या अधिपत्याखाली आणला.
पुढे शिवाजी महाराजांनी चालवलेल्या धामधुमीत आदिलशहाने शाहजी राजांची शिवाजी महाराजांना फूस असल्याच्या संशयाने जिंजीच्या वेढयात असलेल्या शाहजी राजांना बाजी घोरपडे मुधोळकर आणि अफजलखान यांच्या करवी कैद केली. त्यांना विजापुरात आणले त्यावेळी शिवाजी महाराजांनी दिल्लीच्या बादशाहशी पत्र व्यवहार करून आदिलशहावर दबाव आणून शाहजी राजांच्या प्राणावर आलेले हे संकट दूर केले. यानंतर शाहजी राजे विजापुरास चार वर्षे अडकून पडले आणि या काळात शिवाजी महाराजांनी आदिलशाही मुलुखात कोणतीही धामधूम केली नाही. याप्रमाणे पुढे दरबारी लोकांची आणि आदिलशहा यांचा विश्वास संपादन करून शाहजी राजे पुन्हा कर्नाटकात आले.
पुढे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचे चालवलेले प्रयत्न आणि त्यांचे मिळवलेले यश शाहजी राजांच्या कानी येत होते. परंतु त्यांना शिवाजी राजांनी भेट घेता येत नव्हती कारण शिवाजी राजांची ही सगळी धामधूम आदिलशाही मुलुखात होत होती. पुढे आदिलशाही आणि शिवाजी महाराज यांच्यात तह होऊन थोडी शांतता झाल्यावर शाहजी राजांनी स्वदेशी जाण्याची परवानगी आदिलशहकडून मिळवली. आणि मग शाहजी राजे आणि शिवाजी महाराज या थोर पिता पुत्रांची भेट इ.सन १६६२ मध्ये जेजुरीत झाल्याचं म्हटलं जातं. यावेळी जिजाऊ, शिवराय, शाहजी राजे, तुकाऊ, व्यंकोजी राजे या सर्व कुटुंबाची एक समवेत भेट झाली. यानंतर काही दिवसांच्या वास्तव्यानंतर शाहजी राजे कर्नाटकात परत आले.
| फर्जंद शाहजी राजे यांची होदेगिरी (कर्नाटक) येथील समाधी |
अशा प्रकारे शाहजी राजे कर्नाटकात परत आल्यानंतर काही दिवसानंतर आदिलशाही मुलुखाच्या बंदोबस्ताच्या कामगिरीवर असता बेदनूर जवळ होदेगिरी म्हणून गाव आहे, तिकडे शिकारीवर असता घोड्याचा पाय वृक्षवेलीत अडकून शाहजी राजे घोड्यावरून पडले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यावेळी त्यांचे वय सत्तर वर्षांचे होते. इ.सन १६६४ च्या २३ जानेवारीत हे वृत्त घडले.
याप्रकारे शाहजी राजांच्या मृत्यनंतर विजापूरकरांकडून व्यंकोजी राजांचे सांत्वन होऊन मनसबदारीची वस्त्रे त्यांना मिळाली.
बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२
पुन्हा उभारलेल्या निजामशाही तख्ताला संपवण्यासाठी मोगल बादशहा शाहजहान स्वतः दक्षिणेत उतरतो.
मागील भागात आपण पाहिलं की, शहाजहानने पाठवलेल्या सैन्याचा शाहजी राजांनी दोन वेळा पराभव केला. त्याप्रमाणे शहाजहानने विजापूरकरांना धमकीचे पत्र पाठवले. त्यात त्याने असे सांगितले की शहाजीच्या सोबत तुम्ही जो निजामशाही मुलुख घेतला आहे, तो परत करावा आणि शाहजीला कोणतीही मदत करू नये, आणि असे न केल्यास आम्ही फौजेसह तुमच्यावर चालून येऊ. परंतु रणदुल्लाखान वगैरे विजापुरी मंडळींनी शाहजी राजांच्या बाजूनेच राहणे पसंत केले.
| किल्ले माहुली |
वरील सर्व घडामोडी झाल्यानंतर आदिलशहाने शाहजी राजांच्या बाजूने लढण्याचा निर्णय घेलतेला पाहून शहाजहानने आपल्या सैन्याचे चार भाग केले, त्याने दोन तुकड्या शाहजी राजांवर तर दोन तुकड्या आदिलशहावर पाठवल्या. याप्रमाणे शाहजी राजांच्या कब्जातील सोलापूर ते बेदर आणि कोकणपट्टी पूर्ण शत्रूच्या ताब्यात गेली. यावेळी शाहजी राजे अहमदनगर कडे वळाले. तिकडून त्यांनी मोगलांशी कडवा प्रतिकार केला, त्यांनी यावेळी प्रचंड युद्ध कौशल्य दाखवले. पण शत्रू सैन्य जास्त असल्याने त्यांनी कोल्हापूर कडे धाव घेतली. आणि तिकडे त्यांना विजापुरी सैन्याची साथ भेटून त्यांनी मोगलांची गनिमी कावा पद्धतीने लंगडेतोड चालू केली.
आशा प्रकारे शाहजी राजे या प्रांतातून तिकडे तिकडून इकडे पळून आणि गनिमी काव्याचा वापर करून लढत राहिले. या सगळ्या धामधुमीत मोगलांच्या सैन्याची प्रचंड खराबी झाली.
तेव्हा शहाजहानने आपल्या सैन्याला आदेश दिला की, शहाजीच्या मागे लागून आपल्या सैन्याचे खुप नुकसान होते आहे. त्यानुसार त्याच्या फौजेचा मोर्चा विजापुरकडे वळला. आणि मग या एकत्र सैन्याने विजापुरी मुलुखात धामधूम सुरू केली. मोगलांनी विजापुरी प्रांतातील बरेच किल्ले घेतले, प्रांत काबीज केले, शहरे ताब्यात घेतली.
अशाप्रकारे मोगली सैन्य विजापुरी प्रांतात घुसलेले पाहून आदिलशहाने घाबरून जाऊन मोगलांशी तह केला आणि आपल्यावर आलेले संकट थांबवले. त्याप्रमाणे मोगल आणि आदिलशाह यांनी निजामशाही प्रांत आपापसांत वाटून घेतला, यानंतर मोगलांनी विजापुरकरांना अशी अट घातली की, शाहजी राजे त्यांच्या ताब्यातील सगळे किल्ले , प्रांत मोगलांना देतील तरच त्यांना व त्यांच्या लोकांना शाहजहान माफ करेल, विजापूरकरांनी त्यांना कोणत्याही प्रकारची मदत किंवा थारा देऊ नये.अशाप्रकारे मोगल आणि विजापूरकर यांच्यात इ.सन १६३६ त तह झाला.
या तहानंतर मोगलांचा संपूर्ण सेनासागर एकट्या शाहजी राजांच्या मागे लागला. त्यात मोगलांना विजापुरी सैन्याने मदत केली. दरम्यान या मधल्या काळात शाहजी राजे कोकणात उतरून आपल्या हाताशी असलेला मुलुख स्थिरस्थावर करून माहुली किल्ल्यात राहिले. परंतु मोगलांची फौज प्रचंड असल्याने त्यांचा नाईलाज होऊन त्यांनी किल्ला मोगलांच्या स्वाधीन केला आणि मोगलांना आपण केलेल्या सर्व अपराधांची क्षमा करून मला आपल्या नोकरीत घ्यावे असा अर्ज केला. त्याप्रमाणे मोगल बादशाहने असा जबाब पाठविला की तुम्हाला पूर्वी मन्सब दिली असता तुम्ही बंड करून दिल्लीपदपातशाहीच्या विरोधात गेलात तेव्हा पुन्हा तुम्हाला आमच्या पदरी नोकरी मिळणे नाही, पण तुम्हाला विजापूरकरांच्या नोकरीस राहण्याची परवानगी आहे.
| ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील किल्ले माहुली |
असा जबाब मिळाल्यावर त्यांनी माहुली किल्ल्यावर बसवलेल्या बालराजास बादशाहच्या स्वाधीन करून आपण स्वतः विजापुरास गेले. या सर्व घडामोडी इ सन १६३६ मध्ये घडल्या.
रविवार, २० फेब्रुवारी, २०२२
शाहजी राजे निजामशाही तख्ताची पुनर्स्थापना करतात.
मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं कि, शहाजहानने इ. सन १६३३ त निजामशाही राज्य जिंकण्यासाठी मोहबतखानाला निजामशाहीवर फौज घेऊन पाठवले. त्याप्रमाणे फत्तेखानाला नमवून आणि त्यांच्या कब्जातील मुलुखावर विजय मिळवून मोगली फौजा शांत झाल्या. दरम्यान या मोहिमेत शाहजी राजांनी मोगली फौजेवर वेळोवेळी छापे घालून त्यांना हैराण करून सोडले आणि विजापूरकर सैन्यासोबत शाहजी राजांना सुद्धा हार खावी लागली.
| शहाबुद्दीन मुहम्मद खुर्रम(शाहजहान) |
मागे सांगितल्या प्रमाणे शाहजी राजे आणि विजापूरकरांच्या फौजा हार घेऊन दौलताबादेतून मागे फिरल्या. त्यांच्या सोबत परत येताना शाहजी राजांनी पराभवाने खचून न जाता आपल्या हातातील सैन्य जमवायला सुरुवात केली. पुढे त्यांनी मोगलांच्या ताब्यात गेलेला पुणे, चाकण, बालाघाट पर्यंतचा प्रदेश कब्जात घ्यायला सुरुवात केली. त्यांनी मोगलांची अनेक ठाणी उठवली. याच सुमारास शाहजी राजांनी विचार केला की, मोगलांनी घेतलेला मुलुख आपण पुन्हा घेतला तेव्हा आपल्यावर आता लवकरच त्यांची मोहीम होईल, त्यानुसार त्यांनी विजापूरकर आदिलशाही दरबारातील रणदुल्लाखान आणि मुरार जगदेव यांच्या मदतीने दरबाराचा पाठिंबा मिळवला. यानंतर त्यांनी निजामशाहीचा एक वंशज मूर्तिजा नावाचा दहा वर्षाचा मुलगा गादीवर बसवला आणि आपण स्वतः या राज्याचे वजीर झाले. यामुळे निजामशाही घराण्याचा अभिमान बाळगणारे सर्व देशमुख, जहागीरदार,वतनदार शाहजी राजांना सामील झाले. पुढे शाहजी राजांनी निजामशाही चा जो प्रदेश मोगलांनी घेतलेला तो आपण हस्तगत केला. या सगळ्या प्रसंगाची खबर शाहजहान ला लागताच त्याने शाहजीराजांचा बिमोड करण्यासाठी फौज पाठवली पण तिचा शाहजी राजांनी पार धुव्वा उडवला नंतर त्याने दुसरे सैन्य पाठवले त्याचीही तीच अवस्था झाली. यानंतर शहाजहानच्या लक्षात आलं की आपला निजामशाही बुडवल्याचा भ्रम होता, उलट पूर्वीच्या शत्रूपेक्षा अधिक बळकट शत्रूशी आता आपल्याला लढायचं आहे. त्यामुळे चिडून जाऊन शहाजहानने ठरवले की आता शाहजी राजांना आणि आदिलशाह, कुतुबशहा या यावनी राज्यांचा सुद्धा बिमोड करायचा. त्यानुसार तो पिसाळलेल्या चित्त्याप्रमाणे दक्षिणेवर चालून आला.
शुक्रवार, १८ फेब्रुवारी, २०२२
शाहजी राजे मोगलांकडे....
शहाजहानला शाहजी राजांच्या युद्धकुशल गुणांची ओळख होतीच. शिवाय निजामशाही बुडवण्यासाठी आपल्याला शाहजी राजांसारख्या नेतृत्वाची मदतच होईल असे समजून त्याने शाहजी राजांना पाच हजाराची मन्सब आणि निजामशाही कडून त्यांना आधी मिळालेला मुलुख कायम केला. या सगळ्या घडामोडी इ सन १६३० त घडल्या. अशाप्रकारे शाहजी राजे मोगलांच्या नोकरीत गेले. पुढे अशी काही कारणे घडली की त्यांनी मोगलांची नोकरी सोडली आणि पुन्हा स्वतंत्र अंमल चालवून राहिले.
शनिवार, १२ फेब्रुवारी, २०२२
फर्जंद शाहजी राजे
गुरुवार, १० फेब्रुवारी, २०२२
निजामशाहीतील नोकरी
| फर्जंद शहाजी राजे |
शुक्रवार, ४ फेब्रुवारी, २०२२
छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या स्फुर्तीदायक अद्भुत घटनांचा अभ्यास
शिवरायांचे पराक्रमी क्षत्रीय पूर्वज
शिवरायांचा जन्म सुर्यवंशीय क्षत्रिय कुळात झाला, इतिहासकार सांगतात की अयोध्या प्रांतात शिसोदे नावाचे सुर्यवंशीय राजे राज्य करीत होते. त्यांच्यातील एक पुरुषाने नर्मदा नदीतीरी जाऊन तिथे आपले राज्य संपादन केले. पुढे या राजाला दुसऱ्या राज्यांकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ते मेवाड प्रांतात जाऊन राहिले. तिकडे राज्य स्थापन केले, ज्याचे केंद्रस्थान चितोडगड किल्ला होते असे इतिहासकार सांगतात.
गुरुवार, ३ फेब्रुवारी, २०२२
छत्रपती शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या स्फुर्तीदायक अद्भुत घटनांचा अभ्यास.
शिवचरित्र अभ्यासात असतांना आपण शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा त्यांच्या कार्याचा क्रमाक्रमाने अभ्यास करणार आहोत. इ. स. १००० च्या सुमारास परकीय आक्रमक हिंदुस्थानात येऊ लागले होते. संपूर्ण हिंदुस्थान भर आपली सत्ता स्थापित करायला त्यांना ५०० ते ६०० वर्ष लागली, परंतु या काळात त्यांना इथल्या स्थानिक राजांनी विरोध केला नाही असे नाही, पण यात त्यांना यश आले नाही.
शुक्रवार, २८ जानेवारी, २०२२
घाटवाटा- वरंधा घाट
फार पूर्वीपासून भारताचा विविध देशांशी जो व्यापार चालायचा, जसा भूमार्गाने चालायचा तसाच समुद्रमार्गाने सुदधा चालायचा. महाराष्ट्रात ज्या प्रसिद्ध बाजारपेठा होत्या जसे की पैठण, जुन्नर वगैरे यांच्यापर्यंत जी मालवाहतूक चाले, ती याच सह्याद्रीच्या कुशीतून ये जा करणाऱ्या घाटवाटांवरूनच केली जाई. याच मार्गाने त्याची वाहतूक चाले.
सह्याद्रीच सुंदर रूप जस नजरेत भरणारं आहे तसंच ते भीषण रौद्र सुद्धा आहे. याच दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्रीत अनेक घाटवाटा आहेत जसे की नाणेघाट, माळशेज घाट, वरंधा घाट,आंबेनळी घाट,फोंडा घाट,आंबोली घाट. यातील बरेच घाटमार्ग आताच्या काळात पक्के केलेले आहेत. जे आजही कोकण आणि देश यांच्यातील दुव्याचं काम करतात आणि आपल्या अस्तित्वाची साक्ष देतात.त्यातीलच एक वरंधा घाट होय.
महाडच्या पूर्वेला असलेल्या सह्याद्री रांगेत वरंधा घाटमार्ग आहे. या पर्वत रांगेत अनेक उंचच उंच डोंगर आहेत. महाबळेश्वर,रायरेश्वर असे एकापेक्षा एक डोंगर आहेत. या पर्वतांची सरासरी उंची ४००० फूट आहे. आंबेनळी घाटाच्या अलीकडे महाड एमआयडीसी च्या बाजूने एक रस्ता गेला आहे, हाच रस्ता वरंधा घाटात जातो. पुढे आपण वळण वळणाचा रस्ता पार केल्यावर माथ्यावर पोहोचतो. तेव्हा आपल्याला हिरव्यागार खोल दरीचे सुंदर दर्शन होते. इथल्या निसर्ग सौंदर्याची अनोखी दृश्य आपल्याला खंडाळा घाटाची आठवण करून देतात.
वरंधा घाट फारसा रहदारीचा नसला तरीही इथून दिसणारा निसर्ग मात्र आपल्या मनाला भुरळ घालतो,खासकरून पावसाळ्यात तर आपल्याला या उंचावरून दिसणाऱ्या निसर्गाची मोहिनीच पडते. अनेक ठिकाणांहून पडणारे फेसाळ धबधबे याच्या सौंदर्यात भर घालतात. घाटातील डोंगरांनी जणू धुक्याची चादर पांघरलेली असते. त्याचप्रमाणे सगळे डोंगर हिरवी शाल पांघरून बसलेले असतात.
वरंधा घाटाचे ऐतिहासिक महत्त्व सुद्धा तितकेच आहे. अनेक ऐतिहासिक शिवकालीन किल्ले आणि ठिकाणे आपल्याला इथून दिसू शकतात. वरंधा घाटाच्या डाव्या बाजूला असाच एक किल्ला या घाटवाटेच्या रक्षणासाठी कायम उभा आहे, त्याचं नाव आहे कावळ्या किल्ला. त्याची उंची अंदाजे २००० फूट आहे.
त्याचप्रमाणे घाट मार्ग चढत असतांना वरंध गावच्या अलीकडे एक रस्ता शिवथर घळीकडे जातो. समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने पावन झालेली शिवथर घळ येथून जवळच आहे. याच ठिकाणी समर्थांनी श्रीमद दासबोध हा ग्रंथ लिहिला आहे. घाटमार्ग पार केल्यावर पुढे आपल्याला राजगड, तोरणा या किल्ल्यांची शिखरे दिसतात. त्याचप्रमाणे डाव्या बाजूला खाली कोकणातील रायगड किल्लाही दिसतो. तसेच पुढे गेल्यावर आपल्याला रायरेश्वराचे विस्तीर्ण पठार, कंगोरी किंवा मंगळगड किल्ला यांचे दर्शन होते.
महाड ते वरंध घाट अंतर २० किमी आहे. घाट माथ्यावर चहा-भजींची दुकाने आहेत पण राहण्यासाठी आपल्याला पुढे भोरला जावे लागते. वरंध घाट ते भोर हे अंतर ४० किमी आहे. वाटेत आपल्याला रायरेश्वर, रोहिडा, केंजळगड अशी ठिकाणे लागतात. हा सर्व प्रदेश शिवछत्रपतींच्या वास्तव्याने पावन झालेला आहे, त्यामुळे या भागाचं वैशिष्ट्य विशेष आहे.
| वरंधा घाटातून दिसणारं निसर्ग सौंदर्य |
सोमवार, २४ जानेवारी, २०२२
सह्याद्रीची भटकंती
घाटमाथा
महाराष्ट्राला दगडांचा देश असे म्हटले गेले आहे, त्याला कारणही तसेच आहे. सह्याद्री, सातपुडा, बालाघाट यांच्या सारख्या विशाल पर्वत रांगा, असंख्य दुर्गम, दुर्लघ्य किल्ले, अनेक थंड हवेची ठिकाणे अशी विविधता आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते.
रविवार, २३ जानेवारी, २०२२
झाडे आपल्याच मदतीसाठी
औदुंबर-उंबर
| उंबराच्या झाडाला खोडाला आलेली फळे |
विष्णूने नृसिंहावतारात हिरण्यकश्यपूचा वध उंबऱ्यावर बसून केला.त्याच्याशी झालेल्या लढाईत नृसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोडात खुपसून विषबाधेचे शमन केले.लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नृसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांमुळे होणारा दाह थांबला.
अशा प्रकारे आपल्या धर्मशास्त्रात या झाडाचं विशेष महत्व सांगितलं जातं. याचं शास्त्रीय नाव Ficus Racemosa असं आहे. हे झाड ४५ ते ५० फूट वाढतं, याच्या खोडाचा रंग फिकट पांढरा असतो याची फळे खोडाच्या जवळ झुपक्यांनी येतात.
औषधी उपयोग
या झाडाची पाने वाटून विंचू चावल्यावर लावल्यास वेदना कमी होतात. गालगुंडावर या झाडाच्या चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानांवरील फोडांचा उपयोग वांतीवर केला जातो. गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगांवर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात.
जीवशास्त्रीय रचना
उंबर किंवा औदुंबर हा मुख्यतः भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशांत आढळणारा सदापर्णी वृक्ष आहे. जवळपास १२ ते १५ मी. उंच वाढणाऱ्या या वृक्षाची पाने किंचित लांबट, अंडाकृती, टोकदार व गडद हिरव्या रंगाची असतात. उंबराचे फळ म्हणजे नर, मादा, नपुंसक फुलांचा समूह असतो. फळ कापल्यास ही फुले दिसतात. ब्लास्टोफॅगा सेनेस हा चिलटाएवढा कीटक आणि उंबर एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, त्यांच्या सहजीवनातून या कीटकाचे प्रजनन आणि उंबर या वनस्पतीचे परागण ही दोन्ही उद्दिष्टे साध्य होतात. वड, पिंपळ, उंबर व अंजीर या फळांची रचना ही फळात फुले' अशी आहे.यातील नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात. या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक असतात.
उंबराच्या झाडाला पार बांधलेला असेल तर त्या झाडाला औदुंबर म्हणतात. याची सावली अतिशय शीतल असते झाडाचा पाला, फळे, साल गुरांना चारा म्हणून वापरतात. उंबराचे झाड हे पक्षी, कीटक, खारी यांचे आवडते वसतिस्थान असते. माणसे फळे खातात व औषध म्हणून झाडाचा उपयोग करतात. जिथे उंबर असतो तिथे पाण्याचा स्रोत असतो अशी ग्रामीण भागात मान्यता आहे.
याचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते म्हणून या लाकडाचा दाराच्या चौकटीत खालचे बाजूस उंबरा किंवा उंबरठा बनविण्यासाठी वापरतात. त्यायोगे सरपटणारे प्राणी घरात शिरण्यासही अटकाव होत होता.
सूर्योदयाच्या आधी झाडाला खरवडले तर खोडातून चीक येतो. हा चीक गालगुंड झालेल्या गालाला लावला तर आराम मिळतो. हा चीक शीतगुणांचा असून त्यायोगे दाहाचे शमन होते. रक्तस्राव थांबविण्यासाठी तसेच विषावर उतारा म्हणूनही याचा उपयोग करतात.
भरतभूमीला स्वातंत्र्य प्राप्त करून देणाऱ्या तेजसुर्याचा जन्म
मागच्या ब्लॉग मध्ये आपण पाहिलं की, शाहजी राजांनी स्वतंत्र अंमल चालवून कशाप्रकारे स्वराज्याची निर्मिती करण्याचा प्रयत्न केला परंतु मोगल आणि आ...
-
घाटमाथा महाराष्ट्राला दगडांचा देश असे म्हटले गेले आहे, त्याला कारणही तसेच आहे. सह्याद्री, सातपुडा, बालाघाट यांच्या सारख्या विशाल पर्वत रांगा...